काका गेले

काका गेले.
(मनसे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर.)

आज सकाळी भावाचा फोन आला.म्हणाला अरे राजन काका गेले.तेव्हा मी शाळेच्या मुख्य गेटपाशी शाळेत नव्याने येणाऱ्या मुलांचं हसतमुखाने स्वागत करत होतो.आणि हे ऐकलं.साला हे आयुष्य जोकर करत कधी कधी.थोडा बाजूला झालो आणि शांत राहिलो.
राजन काका.आमच्या जवळचा माणूस. शिक्षण कमी होतं.परंतु अंगी असलेली नैसर्गिक हुशारी, मह्त्वाकांक्षी ,स्पष्टवक्तेपणा, स्वभावतः निडर, नेतृत्व क्षमता,दानी वृत्तीचा स्वभाव,अडीअडचणीत मदतीला धावून येणं, आदी गुणांच्या बळावर त्यांनी अगदी प्रतिकुलतेतून अनुकूलतेकडे वाटचाल केलेली.त्यांचं वय ५३ असावं.
अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलनं केली होती.वेगवेगळे विषय घेऊन.अनेक वर्तमानपत्रात त्यांचं नेहमी काही न काही येत असे.त्यांचा मैत्र तर अनेक क्षेत्रातील लोकांशी होता.
हजरजबाबीपणा ,विनोदी स्वभाव ह्या गोष्टींमुळे त्यांचा सहवास हवाहवासा वाटे.आम्हा पुतण्या मंडळींची, लहान थोरांची ते फार मस्करी करत असत.बोलण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नसे.
मला नेहमी म्हणायचे, “आमची आदी ची परिस्थिती काय होती ता तुका माहिती आसा.. आमी खयसून खय इलो ह्या तुका चांगलाच माहिती आसा. काय काय कामा केली. “कोण वाट दाखयणारो नाय होतो.आमचे आमीच काय ते हातपाय मारून हयसर पोचलो.मला त्यांची कमालीची आवडती, शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांचा आत्मविश्वास.तो मला जबरी बळ देई.खूप काही शिकवत असे. शिवाय त्यांचं माणसांप्रती चं निरीक्षण तगडं होतं.
अप्रत्यक्षरीत्या मी त्यांच्यातल्या अनेक सकारात्मक गोष्टी घेतल्या.मी स्वभावतः बंडखोर आहे.
काकांची एक गोष्ट बारकाईने पाहिली होती ती म्हणजे ते अगदी सुरवातीपासून ‘मनसे’ ह्या राजकीय पक्षाशी बांधिलकी जपून होते.दोन वर्षांपूर्वी ते आमदारकी साठी निवडणुकीला मनसे तर्फे उभे राहिले होते.निवडून आले नाहीत पण खूप चांगली मत त्यांना मिळाली होती.ते म्हणायचे ,माझ्या राज साहेबांनी मला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलंयं. आमदारकी साठी उभं केलं .त्यांच्यामुळे मी इथवर आलोय.नाहीतर मी मामुली माणूस होतो रे.
मी बऱ्याचदा वैतागायचो त्यांच्यावर.अहो साहेब साहेब करताय पण तुमची परिस्थिती आधी पहा.राजकारण करून आर्थिक सुबत्ता नाहीये अजून तुमची. बदला आता पक्ष.तुमचं घर चालवायला दुनिया येणार नाही.नाही हा पक्ष. तेव्हा बोलताना मी ते राज ठाकरे असा उच्चारायचो.तेव्हा ते मध्येच तोडून म्हणायचे ..अरे, साहेब म्हण साहेब. पण मी त्यांचं बिलकुल ऐकायचो नाही.
त्यांच्या काही गोष्टी मला बिलकुल पटायच्या नाहीत. पण माणूस म्हटल्यावर चांगले वाईट गुण आलेच. आपल्याला प्रत्येकाकडून जे योग्य वाटेल ते घेत राहावं.हा माझा फंडा आहे.मला योग्य वाटेल तेच मी ऐकायचो. नाहीतर सोडून द्यायचो. त्यावर ते मला नेहमी म्हणायचे , “अरे तूझो काका काय चीज आसा ना ता तुका माहिती नाय.माका कळता मी काय सांगतय ता तू ऐकनय नाय..पण एक लक्षात ठेय. मी तूझो काका आसय..काका.”
परंतु काकांची एक गोष्ट विशेष होती.त्यांनी इतक्या वर्षांत एकदाही मला पक्षात येण्याबद्दल,किंवा पक्षाच्या कोणत्या सभेला,कार्यक्रमाला ये म्हणून सांगितलं नाही.ते आमच्याशी नेहमी राजकारण विरहित असत. माझ्या आई वडिलांचा त्यांना विशेष आदर होता.मोठा भाऊ सरकारी नोकरीत अनुभवी माणूस होता ह्याचा त्यांना अभिमान वाटे.
ते नेहमी नीटनेटके राहत.कडक इस्त्रीचे कपडे,चांगल्या चपला, बूट ह्यांची त्यांना आवड.हा गुण माझ्यातही असल्याने आमचं ह्या बाबतीत जमायचं.मी काही कपडे घातले तर मला विचारायचे, खय घेतलय रे..? अमुक तमुक. गेल्यावर्षी बहिणीच्या लग्नात मी त्यांच्यासाठी चांगल्या प्रतीचा कुर्ता ,पायजमा, जॅकेट घेतलं होतं.आवडीने त्यांनी ते घातलं होतं.
मला एकदा ते तरुण भारत चे विजय शेट्टी ह्यांच्याकडे घेऊन गेले. म्हणाले तुझी ओळख करून देतो.फार चांगला माणूस आहे.तेव्हा त्यांच्या ऑफिसात गेल्यावर काका शेट्टींना म्हणाले ह्यो माझो पुतणो.चित्रकार आसा. लिखाण पण करता.तेव्हा शेट्टी सर म्हणाले, हो मला माहितीये ह्यांच्याबद्दल.मी वाचलंय ह्यांचं लिखाण फेसबुकवर.तेव्हा मला शेट्टींनी तरुण भारत साठी लिहिणार का विचारलं.मी तरुण भारत साठी वर्षभर ‘माय आय’ ह्या सदराखाली लिहिलं.त्यापूर्वी मी स्वांतसुखाय लिहीत असे.मात्र वर्तमानपत्रा साठी पहिल्यांदाच इतकं लिहिलं.
काका ना माझं नेहमी खूप कौतुक असे.बऱ्याचदा म्हणायचे.तू भारतात नाव करतलय दाभोलकरांचा.ह्या लिहून ठेय.माका शंभर टक्के खात्री आसा.त्यावर मी त्यांना म्हणायचो काका, राजकारणी भाषा लोकांकडे वापरा. माझ्यासमोर नको.अरे मस्करी नाय रे.माझे हे शब्द तू लक्षात ठेय.मी त्यांना गमतीने आमदार म्हणायचो. त्यांना म्हणायचो तुम्ही देशपातळीवरील नेते व्हाल.ते ऐकून मला ते म्हणायचे, अरे वा माझी शाळा माकाच.?
मुंबईत काही कामानिमित्त आले की माझ्याघरी असायचे.दिवसभर बाहेर असायचे.रात्री घरी येताना फोन करायचे जेवायला काही आणु का वगैरे..? पैसे खर्च करायला कधी आखडता हात नाही घ्यायचे.गावी गणपतीला आम्ही सगळे एकत्र जमलो की सर्वांसाठी खाऊ,नाश्ता नेहमी मागवायचे.लोकांना खाऊ घालण्यात त्यांना कमालीचा रस होता.
वर्षभरापूर्वी काकांना कॅन्सर ने गाठलं. वेळेवर जे योग्य उपचार करायला हवे होते ते न करता नको ते उपचार घेत राहिले.त्यात कॅन्सर ची पातळी वाढत गेली.अनेक महिने हॉस्पिटल मध्ये उपचार घेतल्यावर घरी परतले.तेव्हा त्यांना पाहायला मी गेलो होतो.त्यांची ती अवस्था.पाहून जोरदार चटका लागला.डोळे डबडबले.
त्या अवस्थेत ते म्हणत “माझा काय खरा नाय रे…पाच सहा महिने धड काढलंय तर पुढे जगान.”
चार दिवसांपूर्वी काकीचा दुपारी मला अचानक फोन आला की त्या टाटा हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या काकांना घेऊन.कणकवलीत जिजी उपरकरांनी मदत केली.त्यांनीच मुंबईला पाठवायची सोय केली. मुंबईत दादर स्टेशनवर विश्रामगृहात आहेत. रात्रीच्या रेल्वेने कणकवलीला निघणारेत. मी म्हटलं येतो मी. तिकडे पोचलो काका ,काकी बसले होते.काकांची अवस्था वाईट होती.हाफ पॅन्ट ,शर्ट. सभोवताली हाताने इशारे करत होते.ह्या अवस्थेत ते केव्हा घरी पण राहिले नसतील.
काकी म्हणाल्या ह्यांना धड उभं राहता येत नाहीये.
ते जे बोलताहेत ते कळत नाहीये. माझ्याकडे एवढ्या सगळ्या बॅगा आहेत. त्यांच्याकडे चार पाच बॅगा होत्या. उपचारादरम्यान मुंबईत राहावं लागेल ह्या अंदाजाने त्या सामान घेऊन आल्या होत्या.ह्यांना सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले रे माझ्या.बराच वेळ झाला होता. मी सगळं ऐकत होतो.काय बोलावं काय करावं काहीच सुचत नव्हतं.आयुष्य किती भिकारचोट अनुभव देतं…? ते कोरडे नाही ना करणार..?
रेल्वे येण्यास काही वेळ असताना तिकडे मनसे ची दोन माणसं पोचली होती.त्यातल्या एकाने काकांना व्हील चेअर वरून गाडी ज्या ठिकाणी होती तिकडे नेलं.प्लॅटफॉर्म बदलावे लागले.मी काकीच्या हातातल्या काही बॅगा घेतल्या.मनसेच्या माणसांनी काकांना रेल्वेच्या डब्यात सीट वर त्यांना झोपवलं.त्यातला एकजण त्यांचा गुपचूप व्हिडिओ घेत होता. कदाचित त्याच्या सेवेचा तो पुरावा ठेवत असावा.हे सगळं मी पाहत होतो. कणकवलीला पोचल्यावर देखील मदतीला फारसं कुणी नव्हतं. त्यांचं घर चौथ्या मजल्यावर.त्यात बिल्डिंग ला लिफ्ट नाही.त्यांचा मुलगा, मुलगी आणि शेजारचा एक जण.रेल्वेतून उतरून घरी जाईपर्यंत वाट लागली.काकी नी संध्याकाळी मला फोनवर सांगितलं.
मला वाटलेलं काकांनी जी त्यांच्या आयुष्यात माणसं जोडली आहेत ती अश्या वाईट काळात ओसंडून वाहतील.स्टेशन वर त्यांच्या साथिंची गर्दी असेल.पण असं काहीच नव्हतं. दादर स्टेशन आणि कणकवली स्टेशन त्यांच्यासाठी सूनं होतं. आयुष्यात कुणी कुणाचं नसतं. स्वतःला मानसिक ,आर्थिक ,शारीरिक रित्या प्रचंड मजुबत करायलाच हवं. कुणावरही विसंबून राहिलो तर संपलो.आपण भारतीय नेहमी तोंड वर करून संस्कार संस्कार बोंबलत असतो मात्र बहुतांश समाजात ते कुठेच दिसत नाहीत.आपण कमालीचे दांभिक आहोत.
शेवटी जीवनाचा सार काय तर….कोण नाय कोणचा डाळ भात लोणचा,.

सुमन दाभोलकर.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *